ॐ शांतिः शांतिः शांति विजया राजाध्यक्ष 'ॐ शांति शांति शांति ' हे विजया राजाध्यक्ष यांचे नाटक आधुनिक श्रीमंत मध्यमवर्गाची आत्मकेंद्रित वृत्ती, त्यांची ऐश्वर्यसंपन्न राहणी, त्यांनी अंगिकारलेले शिष्टाचार आणि कुटुंबात राहूनही प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपणारी जीवनशैली, यांसारख्या काही पैलूचे सूचक दर्शन घडवते. अंजनी आणि इंद्रनील यांच्या सुखी, संपन्न जीवनाची आणि हळूहळू त्यांच्या नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याची ही कथा. महानगरातील आधुनिक जीवनमानात रुळलेली अंजनी आणि महानगरी, आधुनिक जीवनशैली सोडून सरंजामी व्यवस्थेशी नाते सांगणारा, आपल्या गावाकडे परतणारा इंद्रनील यांना प्रयत्न करूनही पुन्हा एकमेकांसोबत राहता येत नाही. अंजनीच्या दुर्धर आजारातही तिला इंद्रनीलची साथ मिळत नाही पण अंजनीला आधार मिळतो तो तिच्या मित्रपरिवाराचा. कौटुंबिक नातेसंबंधापेक्षा व्यक्ती मित्रपरिवाराशी अधिकदृढपणे बांधलेली असते हे आजच्या महानगरी जीवनाचे वास्तव हे नाटक अधोरेखित करते.